नाशिक - विद्यार्थ्यांनी हरित दूत बनून वृक्षसंवर्धनाचा संदेश पोहोचवावा - पालकमंत्री गिरीश महाजन

कुंभ युवा संवाद व वृक्षारोपण कार्यक्रम
नाशिक :- विद्यार्थ्यांनी केवळ वृक्षारोपण न करता लावलेले वृक्ष जगविण्याची जबाबदारी स्वीकारावी.प्रत्येक विद्यार्थ्यांने हरित दूत बनून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.उन्नत नाशिक अभियान,मिशन ग्रीन मान्सून अंतर्गत सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात आज सकाळी ‘कुंभ युवा संवाद’व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पालकमंत्री बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर,आ.सीमाताई हिरे,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,भाजप शहराध्यक्ष सुनील केदार,मा.आ.बाळासाहेब सानप,नगरसेवक सुधाकर बडगुजर,अभिनेते चिन्मय उदगीरकर,अध्यक्ष संजय पगारे, शीतल देशपांडे,नरेंद्र वाणी,मिथ‍िला देशपांडे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले.तसेच नशामुक्त भारत अभियान आणि वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली.यावेळी पर्यावरण संवर्धन,नदी स्वच्छता,पशु-पक्षी संरक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शंकर शिंदे(वन्य जीव संवर्धन),निशिकांत पगारे (गोदावरी नदी संवर्धन), अनिल माळी (पक्षी मित्र),तेजस तलवारे (ब्लॉगर),प्रमोद गायकवाड,शीतल सोनवणे, शीतल उगले,प्रसाद जोशी,कृष्णा गवळी,चिराग पाटील,प्रणम्य ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की,नाशिकची ओळख धार्मिक,सांस्कृतिक आणि निसर्ग समृद्ध शहर म्हणून आहे.ही ओळख अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनात योगदान देणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळ किंवा परिसरात एक तरी वृक्ष लावून त्याची नियमित देखभाल करावी.वृक्षारोपणाचा उपक्रम केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता तो लोकचळवळ बनला पाहिजे.युवकांनी व्यसनांपासून दूर राहून व्यायाम, अभ्यास,देशसेवा आणि समाजसेवेत पुढाकार घ्यावा.स्वतः व्यसनमुक्त राहण्याबरोबरच मित्र आणि कुटुंबीयांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करावे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर स्वच्छ,सुंदर,सुरक्षित आणि प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी युवकांनी स्वयंसेवक म्हणून योगदान द्यावे.गोदावरी नदीचे संवर्धन,परिसर स्वच्छता आणि वृक्षसंवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा,असेही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी युवकांनी पर्यावरण संरक्षणाबरोबरच अमली पदार्थविरोधी अभियानातही सहकार्य करावे,असे आवाहन केले.आयुक्त शेखर सिंह यांनी उन्नत नाशिक अभियानाच्या माध्यमातून वृक्षारोपण,स्वच्छता आणि कुंभमेळ्याच्या नियोजनात युवकांचा सहभाग वाढविण्यात येत असल्याचे सांगितले.
महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी विद्यार्थ्यांनी प्रत्येक घरात एक वृक्ष लावून त्याची जोपासना करावी, असे आवाहन केले.अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी,नागरिक,शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या