प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून'ड्रग फ्री मुंबई' अभियानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन
मुंबई दि.३०:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.या अभियानाच्या प्रारंभाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,यांचे अभिनंदन केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करत हे अभियान नशामुक्त,जागरूक आणि सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,यांनी पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे की,नशा ही समाजाच्या आरोग्य,सुरक्षितता,शांतता आणि विकासासमोरील गंभीर समस्या असून,त्याचा व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर,आत्मविश्वासावर आणि जीवनाच्या दिशेवर प्रतिकूल परिणाम होतो.मादक पदार्थांचे व्यसन हे विशेषतः तरुणांच्या भविष्याला,त्यांच्या प्रतिभेला आणि संधींना मोठा धोका निर्माण करणारे आहे.त्यामुळे नशामुक्त समाजाच्या उभारणीसाठी जनजागृतीबरोबरच कुटुंबातील संस्कार,समाजाची सामूहिक जबाबदारी आणि विविध संस्थांचे समन्वित प्रयत्न आवश्यक आहेत. देशाच्या विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, विकसित भारताच्या निर्मितीची सर्वात मोठी ताकद ही युवकांची स्वप्ने,संकल्प,ऊर्जा आणि सकारात्मक विचारसरणी आहे.तरुणांनी शिस्त,आत्मविश्वास आणि निरोगी जीवनमूल्ये स्वीकारल्यास ते स्वतःच्या प्रगतीबरोबरच राष्ट्राच्या विकासातही मोलाचे योगदान देऊ शकतात,असे त्यांनी म्हटले. ‘नशामुक्त भारत’या राष्ट्रीय संकल्पाच्या पूर्ततेसाठी देशभरात जनजागृती,जनसहभाग,समुपदेशन सेवा आणि पुनर्वसन यांसारखे विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे प्रधानमंत्र्यांनी नमूद केले.गेल्या काही वर्षांत‘नशामुक्त भारत अभियान’हे जनआंदोलन बनले असून विद्यार्थी,युवक,सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटना मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असल्याचा त्यांनी उल्लेख केला. मुंबईतील ऊर्जावान युवकांची स्वप्ने आणि आकांक्षा भारताच्या विकासाशी निगडित असून,त्यांना योग्य दिशा आणि सकारात्मक वातावरण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले‘ड्रग फ्री मुंबई’अभियान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,यांनी व्यक्त केला.या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी हजारो विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहून आणि लाखो युवक ऑनलाइन माध्यमातून नशामुक्त जीवनाची शपथ घेत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत,जनजागृती हेच सर्वात प्रभावी संरक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांना योग्य दिशा देणारा हा उपक्रम निश्चितच ‘नशामुक्त भारत’च्या राष्ट्रीय संकल्पाला नवी गती देईल,असा विश्वास व्यक्त करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,यांनी ‘ड्रग फ्री मुंबई’अभियानाच्या यशासाठी तसेच देशातील सर्व युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या