विद्यार्थ्यांच्या स्वागताला अधिकारी सज्ज; ११२८ शाळांचे पालकत्व स्वीकारणार!

नाशिक :- उन्हाळी सुटीच्या आनंदी आठवणींची शिदोरी घेऊन चिमुकली पावले पुन्हा एकदा ज्ञानमंदिराच्या उंबरठ्यावर सोमवारपासून येणार आहेत.या नव्या शैक्षणिक पर्वाच्या मंगल प्रारंभाच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार,यांच्यासह १,१२८ वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये हजेरी लावणार असून,विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

आनंददायी शिक्षण मिळाल्यास मुलांचा सर्वांगीण विकास होतो, असे विज्ञान सांगते.त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील तज्ञ आनंददायी शिक्षणावर भर देतात.या बरोबर मुलांना शाळेची गोडी लागावी,ते नियमितपणे शाळेत येऊन गळतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी शाळकरी मुलांचे स्वागत वर्ग एक आणि दोनचे अधिकारी स्वतःउपस्थित राहून करणार आहेत.नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे नाशिक महानगरपालिकेच्या शिवाजीनगर मधील शाळा क्रमांक 21 येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. याशिवाय सर्व नियुक्त अधिकारी जिल्हा परिषदेच्या शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. 

तसेच अधिकाऱ्यांना शाळा दत्तक देण्यात येणार आहे.संबंधित अधिकारी वेळोवेळी शाळेला भेट देऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,शाळा व्यवस्थापन समिती, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल, याबाबत आवश्यक उपाययोजना सुचवतील.तसेच शाळेच्या भौतिक सुविधांचा दर्जा,विद्यार्थ्यांच्या खेळाच्या सुविधेचा दर्जा,शाळेतील पूरक व्यवस्था,शालेय व्यवस्थेचा दर्जा,विद्यार्थ्यांना 
स्वच्छतेच्या सवयी,शालेय पोषण आहार यासारख्या विविध विषयांबद्दल मार्गदर्शन करतील.
धोकादायक बांधकाम, वापराअभावी /पाण्याअभावी बंद असलेली शौचालये यासारख्या मुलभूत समस्या आढळून आल्यास, संबंधित यंत्रणेस तत्काळ पावले उचलण्याबाबत सूचना करतील. शैक्षणिक वर्षासाठी दत्तक शाळा म्हणून शाळेचा शैक्षणिक व भौतिक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.हा उपक्रम समाज,पालक यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक करणे व पालकांना आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होणे,तसेच दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत आहे,असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार म्हणाले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या